रत्नागिरी : जिल्ह्यात ६ मार्च ते १० मार्च या कालावधीत उष्ण आणि दमट हवामान राहणार असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबईने वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

काय करावे?

  • पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरी अर्ध्या-अर्ध्या तासाने पाणी प्या.
  • घराबाहेर पडताना डोक्याला टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
  • दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
  • घरातील पडदे आणि झडपांचा वापर करून सूर्यप्रकाश टाळा.
  • उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करा.
  • हलके, पातळ आणि सुती कपडे वापरा.
  • प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा.
  • उन्हात काम करत असाल, तर डोके, मान आणि चेहरा ओल्या कपड्याने झाका.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ओआरएस, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक यांसारख्या पेयांचा वापर करा.
  • अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना पुरेसे पाणी द्या.
  • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करा.
  • रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
  • पंखा आणि ओल्या कपड्यांचा वापर करा, थंड पाण्याने स्नान करा.
  • कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करा आणि कामगारांना विश्रांती घेण्यास सांगा.
  • गरोदर महिला आणि आजारी कामगारांची विशेष काळजी घ्या.
    • काय करू नये?
  • उन्हात जास्त श्रमाची कामे टाळा.
  • मद्य, चहा, कॉफी आणि थंड पेये घेऊ नका.
  • दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
  • शिळे अन्न खाऊ नका.
  • लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद गाडीत ठेवू नका.
  • गडद रंगाचे आणि जाड कपडे घालणे टाळा.
  • शारीरिक श्रमाची कामे टाळा.
  • उन्हात स्वयंपाक करणे टाळा आणि स्वयंपाकघरातील हवा खेळती ठेवा.