रत्नागिरीत भाजपचा विजयोत्सव! नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार; महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांचा पुढाकार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या समारंभात रत्नागिरी उत्तर व दक्षिणमधील खेड, चिपळूण, गुहागर, देवरुख, लांजा, राजापूर व रत्नागिरी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी व्यासपीठावर वर्षा परशुराम ढेकणे, सतीश मोरे (उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष), डॉ. विनय नातू (माजी आमदार, गुहागर), सचिन वहाळकर (शहर संयोजक), दादा ढेकणे (शहराध्यक्ष), वैभव खेडेकर (माजी नगराध्यक्ष) तसेच महिला शहराध्यक्ष भक्ती मनोहर दळी उपस्थित होत्या.

सत्कारप्रसंगी वर्षा परशुराम ढेकणे यांनी मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेच्या विश्वासावर भाजपने मिळवलेले यश हे संघटनेच्या सातत्यपूर्ण कार्याचे फलित आहे. सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जनतेच्या अपेक्षांना न्याय देत विकासाभिमुख कामकाज करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय जनता पार्टीची वाटचाल अशीच अधिक बळकट होत पुढे जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याचे नमूद केले.

समारंभास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील भाजप संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*