मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे.
मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या व बंदरांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, एमएफडीसीच्या कार्यकारी संचालक अनिता मेश्राम यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“शासनाने मच्छिमारांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचे बांधकाम, लाटरोधक भिंती, नौकानयन मार्गातील गाळ काढणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही कामे गतीने पूर्ण व्हावीत. मच्छिमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यावर निधी विहित वेळेत खर्च करण्यात यावा,” असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, यासंदर्भात आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या बैठकीत मच्छीमारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.