राजापूर : गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा प्रहार केला आहे. राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथे भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीचा सुमारे २ कोटी ३६ लाख रुपये किंमतीचा मद्यसाठा आणि कंटेनर ट्रक जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गोव्यातून मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई-गोवा महामार्गावरील पन्हाळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिरासमोर सापळा रचण्यात आला. १ सप्टेंबर रोजी पाळत ठेवून संशयास्पद दहाचाकी कंटेनर ट्रक (क्रमांक: आरजे.१४.जीके.९४६४) अडवण्यात आला.

ट्रकची तपासणी केली असता, त्यात १८६६ बॉक्स गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. या दारूसाठ्यासह ट्रक असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालक आसिफ आस मोहम्मद याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात, दुय्यम निरीक्षक एस.आर.गायकवाड, एस.एस.गोंदकर, जवान अमोल चौगुले, चंदन पंडीत, निलेश तुपे आणि चालक मलिक धोत्रे यांचा सहभाग होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.आर.गायकवाड करत आहेत.

या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवणाऱ्या या टोळीचा तपास पोलीस करत असून, या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत तक्रार असल्यास नागरिकांना उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.