रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे पाटील वाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली.

याबाबतची माहिती वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यु ऑपरेशन राबवत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका केली.

शुक्रवारी मौजे गावडे आंबेरे पाटीलवाडी येथील श्री.निलेश मधुकर पाटील यांच्या घराच्या समोरील विहिरी मध्ये भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या पडला.

याबाबत सकाळी 7.45 वाजता पावस पोलीस ठाणे मधुन मिळालेल्या् भ्रमणध्वनी माहिती नुसार विना विलंब वनविभाग रेस्क्यू टीमचे साहित्य घेऊन शासकीय वाहनांमध्ये पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

विहिरीत पिंजरा उतरवून बिबट्याला एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यामध्ये घेण्यात यश आले. बिबट्यासह पिंजरा विहिरीबाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून वैद्यकीय तपासणी केली सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे 8 ते 9वर्षे वयाचा आहे.

सदर रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण )श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, न्हानू गावडे वनपाल पाली, प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी, शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी, तसेच गावच्या पोलीस पाटील, शिवार आंबेरे गावचे पोलीस पाटील, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, स्वस्तिक गावडे, शाहिद तांबोळी तसेच गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.