शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे. तत्काळ निर्णय घेण्यापूर्वी एक संधी देत आहे. काही ठिकाणी पदे कमी असल्यामुळे कामे झाली नाहीत तर कारवाई होणार नाही ही चुकीची समजूत मनातून काढून टाका. दर आठवड्याला एक तर महिन्याला चार नवीन कामांची अंदाज पत्रके आली पाहिजेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केली. गुहागर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.