रत्नागिरी दि.02:- केंद्र पुरस्कृत महाआवास 2.0 अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला सामील करुन घेत समाज घटकाच्या शेवटच्या स्तरापर्यंत प्रत्येक व्यक्तीला निवास देण्याची संकल्पना पूर्ण करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी केले.

महाआवास 2.0 अंतर्गत आज जिल्हास्तर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले.  यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह जि.प.चे पदाधिकारी व इतर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
महाआवास अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेत रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आला होता तर राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत गतवर्षी जिल्ह्याने राज्यात प्रथम स्थान मिळविले होते.  ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे,  असे सांगून ॲङ परब म्हणाले की, यापुढेही अधिकारी वर्गाने असेच अग्रेसर राहण्याच्या दृष्टीने काम करावे.

‘ड’ यादीत काही नावे वगळली गेली आहेत असा मुद्दा जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आपल्या भाषणात मांडला.  ही नावे समाविष्ट करण्यासोबतच प्रत्येक गरजूला निवासाची सोय करा अशा सूचना पालकमंत्री परब यांनी दिल्या.