रत्नागिरी : ज्या विभागांकडे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांनी तात्काळ कार्यवाही करून ते मार्गी लावावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (7 जुलै 2025) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी मागील प्रलंबित अर्जांचा तसेच नव्याने दाखल झालेल्या अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांनी प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून त्यांची निर्गती करावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांना शेतकरी संघाकडील अर्जांवर बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
तसेच, चिपळूणचे गटविकास अधिकारी आणि गुहागरचे तहसीलदार यांना प्राप्त अर्जांची तपासणी करून वस्तुस्थितीच्या आधारे तक्रारींवर कार्यवाही पूर्ण करण्यास सांगितले. याशिवाय, अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून तक्रारींची निर्गती करण्याचे निर्देश देण्यात आले.