12 आमदारांचं निलंबन केल्यामुळेच मी भाजपच्या रडारवर -आमदार भास्कर जाधव यांची टीका

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले.भास्कर जाधवांनी माफी मागावी नाहीतर त्यांचं निलंबन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. सुरुवातीला कडक भूमिका घेणाऱ्या भास्कर जाधवांनी नंतर बिनशर्त माफी मागत असल्याचं सांगत विषयावर पडदा टाकला. मात्र, 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळेच मी भाजपच्या रडारवर असल्याची टीका जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केलीय.
पक्षातील वरिष्ठांनी मला सांगितलं की पंतप्रधानांची नक्कल केली आहे तर तुम्ही शब्द मागे घ्यावे. त्यामुळे बिनशर्त माफी मागितली. पण फडणवीसांना टोला लगावत म्हणालो की आम्ही एकाच शाळेतील आहोत. सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कशा पद्धतीची टीका-टिप्पणी, नकल्या केल्या त्याचा व्हिडीओ टाकला आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्तिगत टीका केली नाही. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळे मी त्यांच्या रडारवर आहे. माझ्या विरोधात हक्कभंग आणण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे. मी त्याला उत्तर देईन, असं भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*