रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ज्या वेळी स्वॅब मिरज येथे पाठवण्यात येत होते त्यावेळी कोरोना अहवाल २४ तासात येत होते. दरम्यान रत्नागिरीत स्वॅब तपासणीची यंत्रणा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने खुप प्रयत्न केले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोव्हिड टेस्टिंग सेंटर मंजूर होऊन ते सुरु देखील झालं.
मात्र रत्नागिरीत कोव्हिड तपासणी यंत्रणा आल्यानंतर कोरोनाचे अहवाल येण्यास उशिर होऊ लागला. हे असं का होत आहे? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कोव्हिड तपासणीसाठी आलेल्या स्वॅबचे अहवाल २४ तासात मिळावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात व जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी स्वॅब घेतले जातात त्याचे अहवाल उशिरा येतात. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचे संशयीत रूग्ण येतात, त्यामध्ये बहुतांश अहवाल निगेटीव्ह असू शकतात. आम्हाला माहिती मिळत आहे की,
जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वच संशयीताना नमुने घेतल्या नंतर एकत्र ठेवण्यात येते. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णांना कोव्हिड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येते व संशयित रुग्णांना स्वतंत्र कोरोना संशयित वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. कोरोनाचे अहवाल येण्यास साधारण तीन दिवस लागत आहेत, जोपर्यंत अहवाल येत नाहित तो पर्यंत पाॅजिटीव्ह व निगेटिव एकत्र ठेवल्याने कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असते. ही सर्व परिस्थिती रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशासनाला माहित असून देखील जिल्हा शासकीय रुग्णालयातील या समस्येकडे डोळेझाक केली जात आहे?
कोरोनाचे अहवाल वेळेत न मिळाल्याने नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. तसेच ज्या परिसरातून असे संशयित रुग्ण आले आहेत त्या परिसरात, गावात देखील भितीचे वातावरण निर्माण होते. कोरोनाचे अहवाल २४ तासात आल्यास वेळेत उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे स्वॅब अहवाल २४ तासात मिळावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते व अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केली आहे.