मुंबई: राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाउन लागतो की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्य दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. आज दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन करोनाबाधित वाढले आहे तर ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज ११,३४४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के एवढे झाले आहे.