मुंबई : संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेमध्ये सांगितले.सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ, भावना गवळी, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ, भावना गवळी, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची जागा कमी पडत असल्यास या स्मारकासाठी नजीकची आणखी काही जमीन अधिग्रहित करण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक, शूर सेनापती, शौऱ्याचे प्रतिक होते. त्यांच्या पराक्रमाला साजेल असे स्मारक उभारण्याचा मानस आहे.
छत्रपती संभाजी महारांजांच्या शौऱ्याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले “देश धरमपर मिटने वाला। शेर शिवाका छावा था।। महा पराक्रमी परम प्रतापी। एकही शंभू राजा था॥” अशा शब्दात त्यांनी शौर्य वर्णन केले.
कर्नाटक येथील होदिगेरी येथील शहाजी महाराजांच्या समाधी परिसराची डागडुजी करून याठिकाणाचा विकास करण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती करण्यात येणार आहे.
कर्नाटक सरकार त्यास राजी नसल्यास किंवा त्यांना ते शक्य नसल्यास सदर जागेचे महाराष्ट्र शासन स्वतः सुशोभिकरण करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड पिंपळगाव येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.
मंत्री देसाई म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने नाशिक ऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असेलेला जिजामातांचा वाडा 350 वर्षापूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे आणि त्याठिकाणीही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.
सिंदखेड राजा येथील जिजामातांचे जन्मस्थान विकसित करण्यात येणार आहे, उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.