रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड परिश्रम, जनसेवा, न्यायप्रियता आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हा प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात होणार आहे.

यानिमित्ताने ‘युवा प्रेरणा संवाद’ आणि ‘युवती प्रेरणा सन्मान सोहळा’ असे दोन विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

तसेच, राजमाता अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित ‘वेशभूषा स्पर्धा’चे आयोजन करण्यात आले असून, त्यांच्या महान कार्याची आठवण यानिमित्ताने करून दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित राहणार असून, ते युवक-युवतींशी संवाद साधतील.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजयुमो रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने सर्वांना आपल्या परिवारासह उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन रत्नागिरी उत्तरचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल गोंदकर यांच्याकडून करण्यात आले आहे.