राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर गृहमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
गृहमंत्री म्हणाले, 5200 पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारीरिक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.