रत्नागिरी – जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद-2 या मच्छिमार नौकेचे अवशेष मिळाल्यानंतर नौकामालक यांनी जिंदाल कंपनीच्या मालकीच्या फतेहगड या मालवाहू जहाजा विरोधात जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नावेद-2 बोटीला धडक देत अपघात केल्याच्या तक्रारीनंतर जिंदाल कंपनीच्या फतेहगड जहाजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी गेलेली नावेद -2 नौका अचानक बेपत्ता झाली होती. या नौकेला मालवाहू जहाजाने धडक दिल्याचा अंदाज मच्छिमारांनी व्यक्त केला होता.
या नौकेवर सात खलाशी होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला होता. उर्वरित 6 जण अद्यापही बेपत्ता आहेत. शोधमोहीम राबवूनही नौकेचा शोध लागत नव्हता.
त्यामुळे स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले होते. मच्छिमारांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.
40 दिवस बुडालेल्या नौकेचा शोध पोलीस घेत होते. शनिवारी सकाळी स्थानिक मच्छिमारांना नावेद-2 मच्छिमार नौकेचा अँकर, बोया, दोरी आणि फाटलेले जाळे सापडले.
हे अवशेष नावेद-2 या मच्छिमार नौकेचे असल्याचे नौकामालक नासीर संसारे यांनी ओळखले. त्यानंतर नासीर संसारे यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान जिंदाल कंपनीच्या फतेहगडने जहाजाने हलगर्जीपणा केल्यामुळेच नौकेवरील खलाशांच्या मृत्यूला ते जबाबदार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आता आम्ही चौकशी करून लवकरच चार्जशीट दाखल करू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले.