नवी दिल्ली:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे.

तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असं म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन देखील केलं. या, नवी सुरुवात करुया, असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.

शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

सुरुवातीला गुरु नानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे.

गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.