राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात २४ तासांत ८ हजार २९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १७९ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख ४९ हजार २६४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २५ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख १४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज ६ हजार २६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ६ हजार ४६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ३८ लाख १३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ४९ हजार २६४ (१४.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८५ हजार ५८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ७३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.