रत्नागिरी:- आज सकाळी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गळतीमुळे कोणतीही जिवितहानी होवु नये म्हणुन तात्काळ धाव घेतली. तसेच पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथुन जादा कुमक म्हणुन १०० पोलीस अंमलदार रवाना करण्यात आले. तसेच आपत्कालीन साधन सामग्री, फायबर बोट, लाईफ जॅकेट, रिंग बोये, रोप, सर्च लाईट, स्ट्रेचर,प्रथमोपचार पेटी, इत्यादी साहित्य तात्काळ पोहचविण्यात आले. रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन नागरीकांना धरण फुटुन कोणतीही जिवीतहानी होवु नये म्हणुन पी.ए.सिस्टीम व मेगाफोन व्दारे स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन करण्यात आले. स्थलांतरीत होण्याकरीता निर्माण होणा-या अडचणी समजुन घेवुन जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरीत होण्याबाबत सांगण्यात आले. बौध्दवाडी, रोहिदासवाडी, कोंडगांव इत्यादी वाडीतील लोकांना महसुल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याकरीता मदत केली आहे. तसेच सदर घटनास्थळी डॉ.मोहित कुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री काशिद, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, श्री आंबरे, पोलीस निरीक्षक,मंडणगड पोलीस ठाणे, श्री पिठे, पोलीस निरीक्षक, बाणकोट पाेलीस ठाणे, यांनी भेट देवुन नागरीकांना धीर दिला व त्याच्या अडीअडचणी व लागणारी साधन समग्री याबत माहिती घेतली. व जिल्हा पोलीस दल आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असुन इतर शासकीय स्थापनाशी समन्वय ठेवुन आवश्यक ती मदत करणेबाबत ग्वाही दिली.