
रत्नागिरी : रत्नागिरी येथील प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला नेतृत्व आयकॉन पुरस्कार २०२६” ने सन्मानित करण्यात आले. आयुर्वेद क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्व, शिक्षण, चिकित्सकीय सेवा आणि जागतिक स्तरावरील योगदानाबद्दल त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार अग्निकर्म तज्ज्ञ वैद्य चंद्रकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वैद्य निकिता कोळी या कन्सल्टंट आयुर्वेदिक फिजिशियन आणि गर्भसंस्कार तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून जीवनशैली आहे, हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. प्री-कन्सेप्शन केअर, गर्भसंस्कार, गर्भिणी परिचर्या, सूतिका परिचर्या, बाळ संस्कार, आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी, होलिस्टिक हेल्थ आणि वेलनेस या क्षेत्रांत त्यांचे विशेष योगदान उल्लेखनीय आहे.
त्यांनी कर्नाटकातील के.एल.ई विद्यापीठ, बेळगाव येथून बॅचलर्स ऑफ आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी (B.A.M.S.) पदवी प्राप्त केली असून, सध्या अळवास आयुर्वेद मेडिकल कॉलेज, मंगळूर येथे एम.डी. (स्वस्थवृत्त आणि योगा) पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. पदवीच्या काळात शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी त्यांना हिमalaya वेलनेस तर्फे “आयुर्वेद विशारदा पुरस्कार” ने गौरवण्यात आले होते.
वैद्यकीय सेवेसोबतच अध्यापन आणि मार्गदर्शन क्षेत्रातही त्या सक्रिय आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयुर्वेद व वेलनेस अकॅडमींसोबत सहकार्य करून त्यांनी ऑनलाइन कन्सल्टेशनद्वारे भारताबाहेरील अनेक देशांतील रुग्णांना सेवा पुरवली आहे. त्यांच्या उपचारांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण सत्रे घेऊन भारत, युरोप आणि इतर ठिकाणी हजारो विद्यार्थी व आयुर्वेद साधकांना प्रेरणा दिली आहे. आयुर्वेद विद्यार्थी आणि नवोदित चिकित्सकांसाठी त्या संरचित मेंटॉरशिप कार्यक्रम राबवतात, ज्यात B.A.M.S. अभ्यास मार्गदर्शन, एम.डी. नियोजन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि कंटेंट क्रिएशन यांचा समावेश आहे.
“आयुर्वेद ही केवळ चिकित्सा पद्धती नसून जाणीवपूर्वक जगण्याची कला आहे,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आयुर्वेदाच्या शाश्वत ज्ञानातून आरोग्यप्रवास घडवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विश्वगुरु संवाद संस्थेने हा मानाचा पुरस्कार प्रदान केला.

Leave a Reply