रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली आहे.

रत्नागिरीतील कुणाल देसाई यांच्यासह एकूण 42 जणांचा पर्यटक गट श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेला होता. कुणाल देसाई हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवसाय उपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. या गटात त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमधील कर्मचारी वर्गाचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीमुळे या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत रत्नागिरीत चिंता व्यक्त होत होती. या परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने पावले उचलत कुणाल देसाई यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी देसाई यांनी सर्व पर्यटक सुरक्षित असून श्रीनगरमध्ये कोणतीही अडचण नसल्याची माहिती दिली.

या घटनेमुळे रत्नागिरीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.