रत्नागिरी : निवळी येथे रविवारी (दि. ८ जून २०२५) सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे १७ तास ठप्प झाली होती. टँकरमधून गॅस गळती होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती.

महामार्ग पोलिसांनी वाहतूक उक्षीमार्गे वळवली होती, परंतु यामुळे उक्षी घाटातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, तसेच पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली.

पोलिस प्रशासन, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, स्थानिक ग्रामस्थ आणि सर्व संबंधित यंत्रणांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास निवळी घाटातील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणताही अनुचित प्रकार टळला असून, आता वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू आहे.