रत्नागिरी: जिल्ह्यात कोरोनाचा नवा विषाणू म्हणजेच डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण मिळून आल्याचे वृत्त कालपासून व्हायरल होत आहे. मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस किंवा मायनस असे कोणतेच प्रकार आढळले नसून लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवू नये असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत केले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच महाराष्ट्रात डेल्टा प्लस हा कोरोनाचा म्युटेड विषाणू बाधित नवीन रुग्ण सापडल्याचे वृत्त कालपासून संपूर्ण राज्यात व्हायरल झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५ रुग्णांचा समावेश असल्याचेही सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही वेगळीच असल्याचे आज समोर आले आहे. ज्या पाच रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली आहे असं सांगितलं जातं होत त्यांना कोरोनातून बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते व या रुग्णांचे नमुने आता पुन्हा तपासणीसाठी वरिष्ठ लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. पण या रुग्णांना डेल्टा प्लस वैगरे कोणत्याही विषाणूची लागण झाल्याचे रिपोर्ट अजून पर्यंत तरी समोर आलेले नाहीत. त्यामुळे डेल्टा प्लस विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट आशा प्रकारची खोटी माहिती कोणीही व्हायरल करू नये, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेतून केले आहे. ज्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या गावात किंवा वाडीत कडक कंटेन्मेंट झोन तयार केले असून ट्रेसिंग वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या रुग्णांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्यामध्ये नवीन विषाणू दिसून आला आहे की नाही हे स्पष्ट होईल, त्यामुळे चुकीची माहिती जनतेपर्यंत कोणीही पोहोचवू नये जेणेकरून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएन्ट नाही-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Byमाय कोकण प्रतिनिधी
Jun 21, 2021