उच्च न्यायालयाचे आभासी कामकाजही तीन तासच; तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मुख्य खंडपीठाचे आभासी पद्धतीने चालवण्यात येणारे कामकाजही मंगळवारपासून २८ जानेवारीपर्यंत केवळ तीन तासच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी यावेळी होणार आहे.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ न्यायामूर्तीच्या प्रशासकीय समितीने सोमवारी याबाबत निर्णय घेतला. या निर्णयानुसार न्यायालयाचे कामकाज मंगळवारपासून दुपारी १२ ते ३ या वेळेत सलग चालेल.

यापूर्वी ४ जानेवारीपासून संपूर्ण आठवडा न्यायालयीन कामकाज प्रत्यक्ष आणि आभासी (हायब्रीड) अशा दोन्ही माध्यमांतून घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मुंबईतील वाढत्या करोना रुग्णांची संख्या आणि करोनास्थितीबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनंतर जानेवारी अखेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयातील कामकाज हे पूर्णपणे आभासी पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ न्यायमूर्तीच्या प्रशासकीय समितीची सोमवारी तातडीची बैठक झाली. त्यात वकील संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*