रत्नागिरी – टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला.
शासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी कोविड हेल्पलाईन ०२३५२-२२०२८८ या क्रमांकावर संपर्क साधून त्याची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी उद्योजकांनी स्वतःहून पुढाकार घेत काही निर्बंध घालण्याची गरज आहे. संचारबंदीच्या काळात कोरोनाचे संक्रमण कमी व्हावे या हेतूने पोलिस दलाने नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाईदेखील केली. नागरिकांच्या सहकार्यानेच सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे शक्य होणार असल्याचे मत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या वेळी मांडले.