रत्नागिरी: दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शाळा भरवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये आपल्या मुला-मुलींची ‘एन्ट्री’ होणार हे नक्कीच..!
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काहीही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी शाळांनी इंटरनेट, वायफाय सिस्टिम, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा पायाभूत सुविधांची तयारी केली आहे.
तसेच ‘गुगल क्लासरूम’ची निर्मिती केली आहे. मागील वर्षाचा अनुभव घेता ऑनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण केले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाला गेल्या वर्षभर सुटी मिळाली होती. मागील संपूर्ण वर्ष ऑनलाईन माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शाळा प्रत्यक्ष भरल्याच नाही, तर माध्यमिक शाळा अवघ्या एक ते दीड महिन्यासाठी उघडल्या. पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्याने परीक्षा न घेताच मुलांना पास करण्यात आले.