मुंबई: राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे शासन स्तरावर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला आहे. तत्वतः १५ दिवस लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार असून १५ ते ३० एप्रिल लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊन बाबत कागदपत्रांची तयारी सुरू आहे. त्यानंतर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा विचार असून शिवभोजन थाळी माध्यमातून मदत मिळणार आहे. तसेच या वर्गाला थोडी आर्थिक मदत देण्याचाही सरकारचा विचार आहे. अर्थ विभागाने बैठक घेऊन प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. सार्वजनिक वाहतूक लॉकडाऊनमध्ये बंद नसली तरी सरसकट लोकं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरु शकणार नाहीत. लोकांना प्रवास करताना त्यांची योग्य कारणे द्यावी लागणार आहेत. परवानगी शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून लोकं प्रवास करू शकणार नाहीत. त्यावर निर्बंध येणार आहेत.