जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. 21 एप्रिल 2025) केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी एकजुटीने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने आयबी, गृहसचिव, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी यांच्यासह आपत्कालीन बैठक घेतली. शहा स्वत: श्रीनगरला पोहोचले असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परत येऊन या संकटकाळात देशाला एकजुटीचे संदेश दिले आहेत.

विरोधी पक्षांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारिक कर्स यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे.”

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनीही गृहमंत्री शहा यांच्याशी फोनवरून चर्चा करून सीमेपलीकडून झालेल्या या हल्ल्याला ताकदीने प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली. “अशा संकटकाळात सर्वांनी एकजुटीने उभे राहायला हवे. सरकारने सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनीही सरकारला कडक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. “दहशतवाद्यांचे कुटील मनसुबे उधळून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर द्यावे. यासाठी संपूर्ण ताकद वापरली पाहिजे. दहशतवादाशी कोणताही समझोता होणार नाही,” असे ते म्हणाले. मसूद यांनी तीन दिवसांपूर्वी काश्मीरला भेट दिली होती. “काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत होते. सर्वत्र आनंदी वातावरण होते. मात्र अशी दुर्दैवी घटना घडेल, याची कल्पनाही नव्हती,” असे त्यांनी सांगितले.

या हल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील पर्यटन आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि विरोधी पक्षांनी एकजुटीने या संकटाला तोंड देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, लवकरच ठोस उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता आहे.