नवी दिल्ली – भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेने आता भयावह वेग पकडला आहे. करोना संसर्गाचा हा वेग दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त वेगवान असल्याचे मानले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 47 हजार 417 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. जे बुधवारच्या तुलनेत 52 हजारांहून अधिक आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात करोनामुळे 380 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत एकूण 1 हजार 280 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 लाख 17 हजार 531वर गेली आहे. या दरम्यान 84 हजार 825 हून अधिक लोक करोनामुक्त देखील झाले आहेत तर आतापर्यंत 3 कोटी 47 लाख 15 हजार 361 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. ​करोनामुळे आतापर्यंत 4 लाख 85 हजार 35 लोकांचा देशभरात मृत्यू झाला आहे.