नवी दिल्ली : पेगॅसस हेरगिरीप्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे केंद्र सरकारने सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून इस्रायली स्पायवेअरद्वारे अनेकांच्या फोनमध्ये हेरगिरी केली गेली का? या आरोपांचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या उत्तरानंतरच चौकशीसाठी समिनी नेमण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने नमूद केले.

राष्ट्रीय सुरक्षेशी कुठलीही तडजोड झालेली चालणार नाही. फोनवर हल्ला केल्याचा अनेकांचा आरोप आहे. यामुळे एक सक्षम अधिकारीच यावर प्रतिक्रिया देऊ शकेल, असे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात युक्तिवाद केला.

राष्ट्रीय सुरक्षेचे कारण त्यांनी दिले आणि पेगॅगस प्रकरणी तथ्य जाहीर करण्याविरोधात काही तर्क मांडले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे कोर्टाने म्हटले आहे.

https://mykokan.in