रत्नागिरी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश नोंदवले गेले आहे. येथील डॉक्टरांच्या चमूने रंजना रमाकांत जोशी (वय ६८, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांच्यावर गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उदय सामंत प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले आहेत, ज्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे ही मोफत शस्त्रक्रिया शक्य झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजना जोशी यांना गेल्या १५ वर्षांपासून वातामुळे गुडघेदुखीचा त्रास होता. दोन्ही पायांना बाक असल्याने त्यांना उभे राहणे किंवा आधाराशिवाय चालणे शक्य नव्हते.

यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी त्यांच्या डाव्या पायाची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली होती. त्यानंतर १७ मे २०२५ रोजी उजव्या पायाची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया देखील यशस्वीपणे पार पडली.

शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत रुग्णाला चालणे आणि फिरणे शक्य झाले. पायाचा बाक पूर्णपणे नाहीसा झाल्याने त्यांना चालणे आता सुलभ आणि सोपे झाले आहे.

ही गुंतागुंतीची आणि खर्चिक शस्त्रक्रिया उदय सामंत प्रतिष्ठानच्या सहकार्यामुळे मोफत पार पडली.

रंजना जोशी यांनी रुग्णालयात मिळालेल्या उत्तम सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर, भूलतज्ञ डॉ. विनोद कानगुले आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांचे तसेच उदय सामंत प्रतिष्ठानचे महेश सामंत आणि सागर भिंगारे यांचे मनापासून आभार मानले.

या यशामुळे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय सुविधांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सामान्य नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या शासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना या यशामुळे बळकटी मिळाली आहे.