एक एप्रिलला रात्री ताप आला दोन तारखेला डॉ. प्रशांत मेहता साहेबांकडे गेलो. डॉ कुणाल मेहता यांनी तपासले इंजेशन दिले औषध लिहून दिलं आणि डॉ कुणाल मेहतांनी काका आपण टेस्ट करून घेऊ, मी चिट्ठी देतो तसं असेल तर औषध लवकर चालू करू, लवकर बरे व्हाल.

मी डॉक्टरांची चिट्ठी घेऊन दापोलीच्या सरकारी हॉस्पिटलला गेलो टेस्ट पॉझिटिव्ह आली डॉक्टरना फोन केला, त्यांनी होम आयसोलेशची सोय आहे का? असल्यास घरी थांबा 17 दिवस बाहेर पडणार नाही असं लिहून घेतलं काही सूचना दिल्या. दवाखान्यातून दिलेली औषधें घेऊन घरी आलो.

पत्नीला सांगितले ती घाबरणार हे साहजिक होते, मीच तिला धीर दिला सर्व व्यवस्थित होईल, मुलाला व मुलीला मुबईत फोन लावून सांगितले आणि 17 दिवसासाठी स्वतंत्र रूममध्ये गेलो, अंघोळ केली, देवाला तिथूनच नमस्कार केला आणि त्याच वेळी मला संत तुकाराम महाराज्यांचा अभंग आठवला.

कारे दुःखाशी जाशी शरण! दुःखच येइल शरण!! दुःखा संग बोलावे! दुःखा संग चालावे!! दुःखाचे दिनकारा समान येणे जाणे! दुःख हे शिक्षण! दुःख हे अनुभवाचे देणे!! कारे दुःखाशी जाशी शरण! दुःखच येई शरण!!

या अभंगांची मझ्या विचाराला चालना मिळाली, जेवण औषधं झाली, वाफ घेऊन झोपलो पहिला दिवस संपला.

दुसऱ्या दिवशी सकाळी व्यायाम करून घराजवळच्या बागेत गेलो. कारण टेस्ट पोझेटिव्ह आल्या मूळे गडी माणसांना येऊ नका असे सांगितल्यामुळे नारळ , सुपारीच्या बागेचे पाणी, काजूबिया उचलणे या सर्वांचा विचार करीत असताना झाडाच्या फांद्या, शेंडे, नारळ – सुपारीच्या झावळ्या त्यांच्या भाषेत विचारत होते. तब्बेत कशी आहे? ऑक्सिजनची काळजी नको आम्हीं 100% देऊ.

घरात आलो पुस्तक काढली थोडे वाचन केले, जेवण, औषध थोडा आराम केला आणि पुढील दोन तास बागेला पाणी लावले पुन्हा जेवण व औषध वाफ घेतली.
दुःखा संग बोलावे! दुःखा संग चालावे!!
दुसरा दिवस संपला.

अश्याप्रकारे पुढील 15 दिवस याच पद्धतीने वाचन, पोषक आहार , आराम आणि बागेला पाणी लावणे मित्रांचे, बँकेतील सहकारी संचालक, नातेवाईक यांचे फोनवरून चौकशी, त्यांच्याशी बोलणे, ऑक्सिमिटर वर ऑक्सिजन व पल्स डॉ. प्रशांत मेहता साहेबांना सांगणे
अश्या पद्धतीने दिनचर्या असलेमुळे कोणताही त्रास जाणवला नाही. दुःखाचे दिनकारा समान येणे जाणे!!

या 17 दिवसाच्या कालावधीत रामकृष्ण मिशन यांनी प्रकाशित केलेले भगवान श्रीकृष्ण, भक्तीवेदांत स्वामींचे पूर्ण पुरूषोत्तम श्रीकृष्ण, अच्युत गोडबोले यांचे आजच्या आर्थिक स्थितीवरील अनर्थ, आदरणीय चितांमणी देशमुख यांचे होमी भाभा, इतिहास संशोधक य. दि. फडके यांचे समान नागरी कायदा खंड दोन, आणि गिरीश कुबेर यांचे युद्ध जीवाचे एवढे वाचन करण्याची संधी मिळाली आणि मी वाचन पंधरवडा साजरा केला.
दुःख हे शिक्षण! दुःख हे अनुभवच देणं !!

या काळात बरेच चांगले तर काही वाईट अनुभव घेता आले . या काळात माझी पत्नी माधवी, मुलगा हृशीकेष, सून मेघा, मुलगी श्वेता माझे स्नेही डॉक्टर प्रशांत मेहता व डॉ. कुणाल मेहता यांनी माझ्या आरोग्याची काळजी फोन व मेसेज द्वारे घेतली, तसेच आरोग्य विभागाचे दीपक गोरीवले, L I C चे विकास अधिकारी माझे मित्र राजीव करंदीकर, बँकेचे अध्यक्ष जालगावकर साहेब, सहकारी संचालक खोचरे साहेब , सुभाष मालू, अशोक वाडकर, संदीप दिवेकर, विनोद आवळे, रमा बेलोसे, वकील सुशांत बेलोसे मुख्य कार्यकारी अधिकारी थोरात साहेब व अन्य अधिकारी , विशेष उल्लेख करतो माजी आमदार व माझे मार्गदर्शक डॉ. मोकल साहेब (वय 81 वर्षे) फोनवरून दर दोन दिवसांनी चौकशी करतांना पाडव्याला घरीच तब्बेत बघायला आले! अजून काही मित्र अनिष पटवर्धन, सचिन तोडणकर, श्रीराम माजलेकर साहेब, राजेंद्र केळकर, सुनील प्रसादे , माझे पूर्वीचे सहकारी संचालक शैलेश मोरे , विशेष उल्लेख करायला हवा तो माझं मागील 35 वर्षे सहकारी असलेला दीपक म्हसकर याचा रोज बाजारात जाण्यापूर्वी घरी येऊन काही हवे आहे काय? आणि संध्याकाळी बाजारातून घरी येतांना फोन काय आणू का? या कालावधीत ऐक वेगळाच अनुभव घेता आला ! मी या 17 दिवसाच्या कोरोनाच्या आजाराने घेतलेला अनुभव आपल्याला कळावा म्हणून हा लेख लिहिला एकूणच मी आजाराला( दुःखाला शरण गेलो नाही आणि दुःखही मला शरण आलो नाही! अश्या पद्धतीने मी कोरोना बरोबर ते 17 दिवस बरोबरीने घालवले!

विनंती – काळजी घ्या, स्वतःचे आरोग्याची स्वतः काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या, आवश्यक वाटल्यास टेस्ट करून घ्या, लसीकरण करून घ्या.

– माधव शेट्ये – दापोली
मो- 9209709792 / 9422382059