जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 2 जून रोजी रात्रौ 12 वाजल्यापासून 9 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या बाधित होण्याचे प्रमाण 20 टक्के असून 67 टक्क्यांच्या वर ऑक्सीजन बेड व्याप्त आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी उद्या बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात औषधांची दुकाने, आरोग्य विषयक सेवा, आरोग्य विषयक आस्थापना पूर्ण वेळ सुरु राहतील. मात्र या आस्थापनांमधून खाद्यपदार्थ, किराणा माल, वैद्यकिय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. किराणा मालाच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुधविक्रेत्यांना घरपोच सेवा देता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातून प्रवेश करण्यास किंवा जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. केवळ नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी, वैद्यकिय उपचारासाठी व कोविड 19 व्यवस्थापनासाठी, अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या, आणीबाणी प्रसंगी जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा जिल्ह्याबाहेर जाण्यास मुभा देण्यात आली आहे. कोविड निगेटिव्ह चाचणी किंवा ई पास सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
सर्व प्रकारची शासकीय आणि खासगी, सार्वजनिक वाहतूक बंद राहील. केवळ शेतकर्यांना खरिप हंगामाचे पिक कर्जाबाबतच्या कामकाजासाठी 10 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बँका किंवा वित्तीय संस्था सुरु राहतील. सर्व प्रकारचे अत्यावश्यक नसणारे उद्योग व त्यांच्या आस्थापना बंद राहतील. केवळ अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती, उत्पादन, पुरवठा करणारे उद्योग आणि आस्थापना सुरु राहतील. अशा कंपनीच्या कामगारांची वाहतूकीची व्यवस्था कंपनीने करणे बंधनकारक आहे. सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. सर्व पेट्रोल पंप सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरु राहतील. माल वाहतूकीच्या वाहनांना डिझेल किंवा पेट्रोल भरण्यासाठी बंधन राहणार नाही. मालवाहतूकीवर कोणतेही बंधन असणार नाही. मालवाहतूक केवळ दुकानांपर्यंत किंवा आस्थापनेपर्यंत वाहतूक करु शकते. ग्राहकांपर्यंत वाहतूक करता येणार नाही. नियमभंग केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर बंदी आणण्यात येईल. शेतीची बियाणे, खते, किटकनाशके, औजारे यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक, आपत्कालीन शासकीय यंत्रणा तसेच अन्य शासकीय कार्यालये एकूण कर्मचारी संख्येच्या 15 टक्के कर्मचार्यांसह सुरु राहतील असे आदेशात म्हटले आहे.