रत्नागिरी / मुश्ताक खान
एसटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. आज सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. सरकारमध्ये आमचं विलीनीकरण करावं या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत.
काल सकाळी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे कामबंद आंदोलन करायला सुरुवात केली. गुहागर, मंडणगडपासून बंदला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू रत्नागिरी जिल्हा व्यापला गेला. आज सकाळपासून मात्र सर्व गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.
या बंदचा सर्वाधिक फटका आधीच तयारी केलेल्या लोकांना बसला आहे. ज्यांनी आपली तिकीटं आधीच बुक केली होती, काही कार्यक्रमानिमित्त ज्यांना बाहेर जायचं होतं अशा प्रवाशांची प्रचंड अडचण झाली आहे. ठरलेले कार्यक्रम रद्द करण्याची वेळ लोकांवर आली आहे. त्यामुळे काही लोकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार्या तुटपुंज्या पगारा बद्दल प्रवाशांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांना पगारवाढ दिलं गेलं पाहिजे असं काही प्रवाशांचं म्हणणं होतं
यादरम्यान राज्य सरकारची बाजू सुद्धा समोर आली आहे. शासकीय सेवेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण होणार की नाही? याबाबत थेट उत्तर सरकारने दिलेला नाहीये. पण कोर्टाच्या निर्देशानुसार आम्ही कार्यवाही करू, असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटला आहे.
सरकारच्या या भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान होणार आहे का? ते आंदोलन मागे घेणार आहेत का हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.