शिष्टमंडळाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं निवेदन

नागपूर: बारसू गोवळ येथे अन्यायकारक माती परीक्षणाच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत आज विधिमंडळामध्ये आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या सह नेते भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, आमदार वैभव नाईक यांनी उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन चर्चा केली.

सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार डॉ. राजन साळवी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन चर्चा केली.

यामध्ये राजापूर तालुक्यातील बारसु-गोवळ येथे दिनांक २४ एप्रिल ते ११ में, २०२३ या दरम्यान पठारावर शासनातर्फे माती परिक्षण करण्यात आले होते.

या माती परिक्षणाविरुध्द आंदोलन केल्याप्रकरणी सुमारे ३५९ ग्रामस्थांविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या माती परिक्षणाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती घेण्यात आली असता येथे केलेले माती परिक्षण हे पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे सिध्द झालेले असल्यामुळे हे माती परिक्षण व माती परिक्षणाचा अहवालही बेकायदेशीर ठरला आहे.

या माती परिक्षणासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर व जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला असल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामस्थांवर गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा केली असता उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेतो, असे आश्वासन दिले आहे.