रत्नागिरी नगर परिषदेतील कर्मचारी कपात आणि नागरी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक

रत्नागिरी: दहीहंडी आणि गणेशोत्सव तोंडावर असताना रत्नागिरी नगर परिषदेने सफाई कर्मचारी व इतर 55 कर्मचार्‍यांची कपात केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.

कर्मचारी कपातीमुळे कचरा संकलनाच्या गाड्या उशिरा दुपारी लोकांपर्यंत पोहोचत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे खड्डे पडले असून, ते तात्काळ बुजवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे.

याशिवाय, शिळ धरणावरील वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि एमएसईबीच्या हलगर्जीपणामुळे एक्सप्रेस फिडरवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. वीजपुरवठा सुरळीत राहावा, जेणेकरून पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

या सर्व मुद्द्यांवर तात्काळ तोडगा काढावा यासाठी शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, महिला शहर संघटक स्मितल पावसकर यांच्या नेतृत्वाखाली निमेश नायर, दीपक पवार, संजय हळदणकर, बंटी कीर, राकेश नागवेकर, अभिजीत दुडे, सौरभ मुलुष्टे, मनोज साळवी, मनीषा बामणे, हेमंत जाधव आणि इतर शिवसैनिकांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेतली. लवकरात लवकर या समस्यांवर उपाययोजना व्हावी, अशी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*