वैभव खेडेकर शिवसेनेत जाणार?
रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी शिंदे गटाने विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घेण्याची मोहीम तीव्र केली आहे.
शुक्रवारी रत्नागिरीतील चिंचघर येथे मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते वैभव खेडेकर यांना जाहीरपणे पक्षात येण्याची ऑफर दिली.
या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीला उधाण आले होते.
काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय कदम यांनी या कार्यक्रमात रामदास कदम यांच्याशी असलेले वैर संपुष्टात आल्याचे जाहीर केले. “माझ्यातले आणि योगेश कदम यांच्यातले राजकीय मतभेद मी भैरीच्या पायाखाली गाडून टाकले आहेत,” असे संजय कदम यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हणाले, “आमच्यातला संघर्ष संपल्यामुळे योगेश कदम यांना आता लॉलीपॉप मिळाला आहे.”
या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनीही राजकीय टोलेबाजी केली. वैभव खेडेकर यांना उद्देशून ते म्हणाले, “आज जे व्यासपीठ तयार झालंय ते असेच राहावं. संजय कदम यांनी रामदास कदम यांचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे माझी अडचण दूर झाली आहे. संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय संघर्षात हळूच माझं नाव यायचं. त्यामुळे रामदास भाईंच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण व्हायचा.”
रामदास कदम यांनी संजय कदम यांना टोला लगावताना म्हटले, “२००९ मधल्या माझ्या पराभवामुळे संजय कदम यांना महाराष्ट्राची विधानसभा पाहायला मिळाली. दापोली सोडून दुसरीकडे प्रयत्न केले तर संजय कदम आमदार होतील. फक्त दापोलीचा विचार करू नका.”
रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांना शिंदे गटात येण्याची ऑफर देताना म्हटले, “वैभव खेडेकर यांना राज ठाकरेंकडे मीच घेऊन गेलो होतो. त्यांचा राजकीय गुरू मीच आहे. आपण एका कुटुंबातली माणसं आहोत. पुढे काय करायचं हे वैभव खेडेकर यांना माहिती आहे. समजने वाले को इशारा काफी है.”