रायगड : मुश्ताक खान

भरतामध्ये जय जवान आणि जय किसानचा नारा माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झालं आणि लोकं आपपल्या गावी परतू लागली. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. लोकं आता हळू हळू शेतीकडे वळू लागली आहेत. शेती व्यवसायच शाश्वत आहे हेच या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा देखील आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर लावणी रमलेला पहायला मिळाला. त्यामुळे ट्विटरवर ट्विट करून शेतीचं महत्व पटवून दिलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यानं “दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, जय जवान! जय किसान ! असं म्हटलं आहे.

सलमान खाननं आपल्या पोस्टमध्ये स्वत:चा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. तो शेतामध्ये हातात भाताच्या पेंड्या घेऊन लावणी तयारीत दिसत आहे. शेतकरी घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी केली आहे. भारतामध्ये शेतकऱ्यांचा मान सन्मान आणि महत्त्व या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना कळून येत आहे.

कोकणामध्ये चाकरमानी रमले भात शेतीमध्ये

लॉकडाऊनच्या काळात कोकणामध्ये २ लाखापेक्षा जास्त चाकरमानी मुंबई, पुणे येथून दाखल झाले आहेत. या चार महिन्यांमध्ये अनेकांनी स्वत:ला शेतीमध्ये झोकून दिलं आहे. भात लागवडीमध्ये आपल्या नातेवाईकांना ते मदत करत आहेत. वर्षानू वर्ष मुंबईत राहिलेल्यांना शेती करताना खूप अडचणी येत आहेत पण त्यावर मात करत ते पुढे सरकरत आहेत.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून अनेकांना शेती संदर्भात मार्गदर्शन देखील देण्याचं काम सुरू आहे. सध्या गावा गावात जाऊन विद्यापीठाचे प्राध्यापक शेतकऱ्यांना मदत करत आहे. शेती संदर्भात कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संजय भावे यांच्या ९४२२५५६५६५ या क्रमांकावर संपर्क करावं.