मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितींच्या दिनांक २२ जून, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधान भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत आरटी-पीसीआर चाचणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दोन्हीही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै, २०२१ या निर्धारित वैध कालावधी साठीची आरटी-पीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल.लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-१९ संदर्भातील प्रतिपिंड चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांना सुध्दा आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहिल.