भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण : महाराष्ट्राला नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेते

रत्नागिरी (मुश्ताक खान) : रविंद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण राहिला आहे. त्यांनी पक्षासाठी स्वतःला झोकून देऊन काम केला आहे. या लेखाच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूया

वैयक्तिक परिचय
रविंद्र चव्हाण, ज्यांना ‘रवी दादा’ म्हणून सर्वत्र ओळखले जाते, हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आहे. २० सप्टेंबर १९७० रोजी जन्मलेले रविंद्र चव्हाण यांनी बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबिवली येथे आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलींसह राहणारे रवी दादा त्यांच्या साध्या आणि कार्यक्षम जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर https://ravindrachavan.in/ उपलब्ध आहे.

राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन
‘समाजकारण हे रस्त्यावर आणि राजकारण चार भिंतीत’ असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, रविंद्र चव्हाण यांनी हा समज बदलला.

त्यांचा विश्वास आहे की समाजकारण हे दाखवण्यासाठी नव्हे, तर कर्तव्य म्हणून करायचे असते. राजकारणात पक्षनिष्ठा आणि देशहिताला प्राधान्य देत, सोपवलेली जबाबदारी कठोरपणे पार पाडायची, हा त्यांचा खाक्या आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन रविंद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

राजकीय प्रवासाचा मागोवा
रविंद्र चव्हाण यांचा गेल्या २५ वर्षांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, त्यांनी मेहनत, संवाद कौशल्य आणि विचारधारेशी एकनिष्ठता यांच्या बळावर सामान्य कार्यकर्त्यापासून महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे:

  1. २००२: भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड. येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
  2. २००५: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजय. येथे त्यांनी स्थानिक स्तरावर विकासकामांना चालना दिली.
  3. २००७: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती म्हणून निवड. या पदावर त्यांनी प्रशासकीय क्षमता सिद्ध केली.
  4. २००९: नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पहिले आमदार म्हणून दणदणीत विजय. त्यानंतर २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग विजय मिळवत डोंबिवलीत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
  5. २०१६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश. यावेळी त्यांनी रायगड आणि पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांचा कारभार त्यांनी यशस्वीपणे पाहिला.
  6. २०१९: कोकणातील सर्वाधिक मताधिक्याने विधानसभा निवडणूक जिंकणारे आमदार.
  7. २०२०: भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक, जिथे त्यांनी पक्ष संघटनेला बळकटी दिली.
  8. २०२२: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्यांचा कारभार, तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री.

महत्त्वाचे योगदान
रविंद्र चव्हाण यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे ठरले आहे. त्यांच्या कार्याचा आढावा खालीलप्रमाणे:

1. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

  • आनंदाचा शिधा आणि रेशन आपल्या दारी: या योजनांद्वारे गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुलभ केला. या उपक्रमांनी सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत केली.
  • डिजिटलायझेशन: या खात्याच्या कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवली.

2. सार्वजनिक बांधकाम

  • मुंबई-गोवा महामार्ग: वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महामार्गाच्या विकासात रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्र आणि राज्य सरकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, भूधारक, वित्तीय संस्था आणि कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून त्यांनी या प्रकल्पाला गती दिली.
  • रस्ते आणि पूल: स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ९२ हजार कोटींची रस्ते आणि पूलांची कामे पूर्ण केली. यात २३,८८६ किमी लांबीचे रस्ते आणि १,०५४ पूल पूर्ण झाले, तर २९,०४१ किमी रस्ते आणि १,७९७ पूल प्रगतिपथावर आहेत.
  • शासकीय इमारती: ३४ हजार कोटींच्या खर्चाने न्यायालये, प्रशासकीय कार्यालये आणि शासकीय विश्रामगृहे यांचे बांधकाम आणि नूतनीकरण पूर्ण केले.

3. पायाभूत सुविधा विकास

  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC): रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ यांच्या उभारणीसाठी आणि देखभालीसाठी या महामंडळाची स्थापना झाली.
  • कोकण रेल्वे स्थानके: कोकण रेल्वे मार्गावरील १२ प्रमुख रेल्वे स्थानकांना विमानतळासारखा आधुनिक लुक देण्याची संकल्पना रविंद्र चव्हाण यांनी राबवली.

4. धार्मिक आणि सांस्कृतिक योगदान

  • अयोध्या महाराष्ट्र भक्त निवास: श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी अयोध्येत ९,५०० चौ.मी. क्षेत्रफळावर १२ मजली भक्त निवास उभारण्याचे भूमिपूजन आणि जमीन अधिग्रहण रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झाले.
  • काश्मीर महाराष्ट्र भवन: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात पर्यटकांसाठी १०,११७ चौ.मी. जमिनीवर भवन उभारण्याचा निर्णय आणि ९.३० कोटींची तरतूद.
  • अष्टविनायक यात्रा: रविंद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी अष्टविनायक यात्रा एका दिवसात पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध झाली.
  • मंदिरांचे संवर्धन: श्री उत्तेश्वर मंदिर (महाबळेश्वर), श्री एकविरा आई मंदिर (कार्ला) आणि श्री कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर) यांचे जतन आणि परिसर विकास.

5. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल भक्ती

  • मॉरिशस येथे पुतळा: मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी मोलाचे सहकार्य. २०२३ मध्ये मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले.
  • डोंबिवलीतील अखंड ज्योत: गेल्या ११ वर्षांपासून डोंबिवली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात अखंड ज्योत प्रज्वलित आहे.

6. नवी मुंबई विमानतळ

  • दि. बा. पाटील नामकरण: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २०२१ मध्ये संघर्ष आणि २०२४ मध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व.

7. सामाजिक उपक्रम

  • कातकरी कुटुंबांना जमीन दान: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांचा घराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी रविंद्र चव्हाण यांनी स्वतःच्या मालकीची जमीन दान केली.
  • डोंबिवलीकर मासिक: गेल्या १६ वर्षांपासून डोंबिवलीकर मासिकाचे संपादक म्हणून रविंद्र चव्हाण कला, क्रीडा, साहित्य आणि संस्कृतीला प्रोत्साहन देत आहेत.
  • डोंबिवलीकर उपक्रम: डोंबिवलीकर सुपर सिंगर, सुपर डान्सर, आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार, रोझ फेस्टिव्हल, किलबिल फेस्टिव्हल, श्रीराम मंदिर प्रतिकृती, न्यू फोर्स अकॅडमी, फ्रेंडशिप रन, GRD मॅरेथॉन यासारख्या उपक्रमांनी डोंबिवलीला सांस्कृतिक केंद्र बनवले.
  • श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा: २०२४ मध्ये अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डोंबिवलीत भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारली, ज्याचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

8. पक्ष संघटना आणि नेतृत्व

  • संघटन पर्व अभियान: रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात दीड लाख सक्रिय आणि दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी, ही ऐतिहासिक कामगिरी आहे.
  • विविध नेत्यांचा भाजपात प्रवेश: काँग्रेसचे माजी आमदार संग्रामजी थोपटे, शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला.
  • कामगारांचा विश्वास: इंडिगो एअरलाईन्सचे २,००० कर्मचारी आणि २९,००० माथाडी कामगारांनी भाजपात प्रवेश केला.

9. डिजिटलायझेशन आणि इनोव्हेशन

  • रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम आणि अन्न, नागरी पुरवठा खात्यांचे डिजिटलायझेशन करून प्रशासकीय कार्यक्षमता वाढवली.
  • डोंबिवली येथे डिजिटल अकॅडमी स्थापन करून युवकांना कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

10. सामाजिक संवाद आणि जनसंपर्क

  • रविंद्र चव्हाण यांचे युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी संवाद साधण्याचे कसब अप्रतिम आहे. त्यांच्याकडे येणारा प्रत्येकजण समाधानी होऊन परततो.
  • त्यांनी डोंबिवलीला एक सांस्कृतिक कुटुंब बनवले, जिथे प्रत्येक नागरिकाला आपलेपणाची भावना निर्माण झाली.

सामाजिक माध्यमे

  • X: @RaviDadaChavan
  • Facebook: ravindrachavanofficial
  • Instagram: ravindrachavanofficial
  • YouTube: Ravindra Chavan Official

रविंद्र चव्हाण यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, विचारधारेशी एकनिष्ठता, प्रचंड मेहनत आणि उत्तम संवाद कौशल्याच्या बळावर सामान्य कार्यकर्त्यापासून महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला.

पायाभूत सुविधा, पर्यावरण, शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य त्यांना ‘मॅन ऑफ मिशन’ बनवते. रविंद्र चव्हाण यांचे हे योगदान येणाऱ्या काळात महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*