रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. सध्या विविध विभागांतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी बदल्यांना गती मिळणार आहे. बदलीसाठी पात्र असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सोयीस्कर नेमणुकीसाठी जोरदार फिल्डिंग सुरू केली आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विहित कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या आगमनाबरोबरच बदलीची उत्सुकता लागते. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरही कार्यकाल संपलेल्या अधिकाऱ्यांकडून सोयीस्कर बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्यांसाठी प्रशासनाकडून माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत वारंवार आढावा घेतला जात असून, बदली प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेत आहे. 

अर्जांची होणार कसून छाननी
रत्नागिरी जिल्हा परिषदेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. यामुळे काही अधिकारी आणि कर्मचारी मोकाटपणे वागत असल्याचे चित्र आहे. पदाधिकारी आणि सदस्य नसल्याने त्यांच्या कृतींकडे कोणाचेही लक्ष नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेची देशभरात वेगळी परंपरा आणि नावलौकिक आहे. या नावलौकिकाला कुठेही डाग लागू नये, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.