रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर शाखेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला.
हा कार्यक्रम शहराध्यक्ष परशुराम ढेकणे यांच्या संयोजनाखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, कोकण पदवीधर विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, पदवीधर आघाडी संयोजक मनोज पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
10वी आणि 12वी मिळून एकूण 70 विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सोहळ्याला उपस्थित होते. शिर्के प्रशालेचे शिक्षक राजेश आयरे यांनी विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी माहिती देत पुढील शैक्षणिक वाटचाल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश आखाडे यांनी केले. यावेळी महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, संगीता कवितके, सायली बेर्डे, संदीप सुर्वे, नितीन जाधव, सचिन गांधी, मंदार खंडकर, शैलेश बेर्डे उपस्थित होते.