मुंबई: कोरोनाविरोधतल्या लढाईतलं दुसरं सर्वात महत्वाचं शस्त्र म्हणजे मास्क. याच मास्कमुळे कोरोनाचा थेट संसर्ग रोखणं शक्य आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदींपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यानं कोरोना काळात एकच सल्ला दिला…आणि तो म्हणजे ‘मास्क अप’. भारतात या मास्कच्या वापरात मुंबई शहराचा प्रथम क्रमांक लागतोय. मुंबईतील 76.28 टक्के लोक हे मास्कचा वापर करतात तर पुण्यातील 33.60 टक्के लोक मास्कचा वापर करतात असं डिजिटल इंडिया फाऊंडेशनच्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. डिजिटल इंडिया फाऊंडेशननं देशातील मास्कच्या वापरावर एक सर्वेक्षण केलं आहे. देशातल्या 11 शहरांमध्ये 27 दिवस हे सर्वेक्षण झालं. 23 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2021 या कालावधीत 911 जणांच्या मुलाखती झाल्या आणि त्यानंतर 11 शहरांमधल्या मास्क वापरणाऱ्यांची आकडेवारी समोर आली. यामध्यमे मुंबईत सर्वात जास्त लोक मास्कचा वापर करत असून त्याचं प्रमाण हे 76.28 टक्के इतकं आहे. तर अर्धवट मास्क न घातलेल्या लोकांचं प्रमाण हे 17.57 टक्के इतकं आहे. मुंबईत 6.15 टक्के लोक मास्कचा वापर करत नाहीत असं या अहवालातून समोर समोर आलं आहे. मुंबईत गेल्या दोन वर्षांत जवळपास 80 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.