रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे बंद असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम दरम्यान चालवण्यात येणारी दुरंतो सुपरफास्ट स्पेशल गाडी येत्या १० जुलैपासून पुन्हा कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे. गाडी क्र. ०१२२३/०१२२४ लो. टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम सुपरफास्ट गाडी १० जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत मंगळवार तसेच शनिवारी रात्री ८ वा. ५० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी एर्नाकुलमला सायंकाळी ७ वा. ४० मिनिटांनी पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१२२४) एर्नाकुलमहून ११ जुलैपासून दर बुधवार तसेच रविवारी मुंबईसाठी सुटणार आहे. ही गाडी एर्नाकुलमहून रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.४५ वा. मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल. कोरोना महामारीमुळे ही गाडी अनेक महिन्यांपासून बंद होती. आता हळुहळू रेल्वे सेवा पूर्ववत होऊ लागल्याने ही गाडी पुन्हा कोकण रेल्वेमार्गे सोडण्यात येणार आहे.