ईडीने ‘ते’ पैसे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना दिले का?; काँग्रेसचा गंभीर सवाल

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रत्युत्तर दिलं. तसंच भाजपच्या अनेक नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर घणाघाती आरोपही केले. संजय राऊत यांच्या या आरोपांना आता काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्याकडून भाजपवर करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडं पाडलं आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी,’ अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

‘ईडीने पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठवले का?’

संजय राऊत यांच्या आरोपांनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राऊत यांच्या पाठीशी आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठवले का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असंही पटोले म्हणाले. तसंच हे सर्व पेपर राऊत केंद्र सरकारला देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे, त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

‘सोमय्या यांच्यासारखे भाजपचे नेतेच घोटाळेबाज’

‘केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे ब्लॅकमेल करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयएच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या कारवायांमधून हे दिसून आलं आहे. सरकार पाडण्यासाठी उतावीळ झालेले भाजपाचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम असून हे सरकार पडणार नाही आम्ही सर्व एकत्र आहोत. संजय राऊत यांनी आज पुराव्यासह भाजपातील नेते व भाजपाशी संबंधित लोकांचे काळे धंदे उघड केले आहेत. घोटाळ्यांचे आरोप करणारे सोमय्यासारखे भाजपवालेच घोटाळेबाज आहेत हे आता स्पष्ट झाले आहे,’ असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*