मंडणगड, ता.२७:- गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आंबेत- म्हाप्रळ पूल आज दिनांक २७ जून २०२१ रोजी राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला.रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाचा पूल असून वाहतूक सुरू झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पुलाच्या लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दुरुस्ती कामाबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले, आंबेत पूल कमकुवत झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुसीसाठी सुमारे बारा कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. पूल बंद केल्याने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांची फार मोठी गैरसोय होत होती. त्याला जेटीचा पर्याय देण्यात आला होता. मात्र पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली होती. ती पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीतील मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी याकामी पाठपुरावा केला. यामध्ये लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे, आमदार म्हणून मी स्वतः लक्ष घातले. तसेच दापोली विधानसभा मतदार संघाचे, मा.आमदार संजय कदम याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने पाठपुरावा ठेवला. सर्व तांत्रिक बाजूंची पडताळणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूल वाहतुकीसाठी योग्य झाल्याचे तपासून घेतल्यानंतर त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.बामणे, अधीक्षक अभियंता आर.एम. गोसावी व अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येत आहे असे त्या म्हणाल्या. पूल सुरू झाल्याने प्रवासी, नागरिकांची गैरसोय दूर होवून दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा दुवा पुन्हा दळणवळणसाठी चालू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार संजय कदम, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, रमेश दळवी, अजय बिरवटकर, नितीन म्हामूणकर, वैभव कोकाटे, राकेश साळुंखे, मोबिन परकार, अनिल रटाटे, बशीर मसुरकर, दीपक घोसाळकर, राजा लेंडे, राजेंद्र आंबेकर, सतीश दिवेकर, अनंत शिगवण, सर्फराज चिपोळकर, सज्जाद मुकादम व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन पुलाला महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंजुरी आणण्याचा प्रयत्न;
दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्वाचा भाग असल्याने याठिकाणी भविष्यकाळाचा वेध घेता नवीन पूल होणे आवश्यक आहे. तशी मागणी सातत्याने होत आहे. त्याचाच भाग म्हणून संबंधित विभागाने त्याचा प्रस्ताव सादर केला असून महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्याला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
मंडणगड, दापोलीकरांच्या सोयीसाठी राष्ट्रवादीचा पाठपुरावा;
पूल बंद असल्याने मंडणगड, दापोली तालुक्यातील नागरिकांची फार मोठी गैरसोय होत असल्याचे पाहून राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम हे सातत्याने पूल लवकरात लवकर सुरू होण्यासाठी मंत्री महोदय व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करीत होते. आदिती तटकरे यांनी विशेष लक्ष घालून दुरुस्ती काम पूर्णत्वास न्हेल्याने त्यांचे मंडणगडच्या वतीने मुकादम यांनी आभार मानले.