दापोली : दापोलीतील सायकलप्रेमींनी १२ ते २४ जून २०२५ या कालावधीत हरिद्वार ते केदारनाथ ते हरिद्वार असा ६००+ किमीचा सायकल प्रवास पूर्ण करत केदारनाथसह अनेक अध्यात्मिक स्थळांना भेटी दिल्या.

या प्रवासात प्रत्येकाने आपले सामान स्वतःच्या सायकलवर वाहून नेले, कोणत्याही अतिरिक्त वाहनाचा वापर न करता.

हिंदूंच्या चार धामांपैकी एक असलेले केदारनाथ हे समुद्रसपाटीपासून ३५८४ मीटर उंचीवर हिमालयातील गढवाल प्रदेशात वसलेले सर्वात उंच ज्योतिर्लिंग आहे.

येथे पोहोचण्यासाठी १७ किमीचा खडतर ट्रेकिंगचा मार्ग पार करावा लागतो.

या सायकल यात्रेत दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव, शरद भुवड यांच्यासह मुंबईतील सतिश जाधव (वय ६८), विजय कांबळे, विशांत नवार, नवनीत वरळीकर, विकास कोळी आणि आदित्य दास यांनी सहभाग घेतला.

या प्रवासात हरिद्वार, ऋषिकेश, शिवपुरी, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग, कीर्तीनगर, गुप्तकाशी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर, महाकवी कालिदास यांना विद्या प्राप्त झालेले कालीमठ येथील महाकाली मंदिर, हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद असताना देवाच्या मूर्ती ठेवल्या जाणारे उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिर, अगस्त ऋषींची तपोभूमी अगस्तमुनी, गौरीकुंड, केदारनाथ धाम, आदि शंकराचार्य समाधी, शिव-पार्वती यांचे लग्न झालेले त्रियुगी नारायण, श्रीनगर येथील धारीदेवी मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. याशिवाय, गंगा नदीत रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतला आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात आला.

दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव यांनी सांगितले, “हिमालयातील उत्तराखंडच्या गढवाल भागातील डोंगररांगा, गंगा, अलकनंदा आणि मंदाकिनी नदीच्या किनाऱ्याने सायकल चालवणे अत्यंत आव्हानात्मक होते.

रस्त्यावरील दरडी, वाहनांचा ट्रॅफिक, थंडी, वारा, पाऊस, खडखडाट घाट, तीव्र चढ-उतार, चिखल, बर्फाचे ग्लॅसिअर यांसारख्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु, आमच्या टीमचा सराव, एकजूट, स्थानिक ग्रामस्थांचे स्वागत, पाहुणचार, निसर्गाचे सौंदर्य आणि अध्यात्मिक वातावरण यामुळे ही यात्रा अविस्मरणीय आणि यशस्वी ठरली.” त्यांनी पुढे सांगितले की, या प्रवासात त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व स्थानिकांना पटवून दिले.

ही आव्हानात्मक केदारनाथ सायकल यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व सहभागींचे कौतुक होत आहे.