रत्नागिरी : कोल्हापूरमधील २८ जणांचा पर्यटक गट केवळ दैव बलवत्तर म्हणून काश्मीर मधील दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे.

या गटात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील शिवप्रसाद चौगुले आणि त्यांच्या पत्नी प्रियांका चौगुले यांचाही समावेश होता.

पहलगाम येथे घडलेल्या दुःखद घटनेच्या केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा गट होता.

या भयावह अनुभवातून सुखरूप बाहेर पडलेल्या चौगुले दाम्पत्याने या घटनेबाबत आपले अनुभव कथन केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून गेलेला हा २८ जणांचा गट पहलगाम परिसरात पर्यटनासाठी गेला होता. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, त्या ठिकाणापासून हा गट केवळ काही किलोमीटर अंतरावर होता.

घटनेची माहिती मिळताच गटातील सदस्यांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही, आणि सर्व सदस्य सुरक्षित राहिले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवप्रसाद आणि प्रियांका चौगुले म्हणाले,

“आई भवानीच्या आशीर्वादामुळे आणि नशिबाच्या जोरावर आम्ही या संकटातून सहीसलामत बाहेर पडलो. दुर्घटनास्थळाच्या इतक्या जवळ असूनही आम्ही सुरक्षित राहिलो, याचा विचार करताच अंगावर शहारा येतो. देवाचे आणि आई भवानीचे मनःपूर्वक आभार.”

या घटनेमुळे पहलगाम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही, चौगुले दाम्पत्याने आणि त्यांच्या गटातील इतर सदस्यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले, तरी सर्व सदस्यांनी एकमेकांना आधार देत परिस्थिती हाताळली.

स्थानिक प्रशासनानेही पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली, अशी माहिती आहे.