रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे किनारी भागात झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून शनिवारी (दि. 5)पाहणी करण्यात आली. बाधित आंबा बागायतदारांसह मिरकरवाडा बंदरात नुकसान झालेल्या मच्छीमारांशी संवाद साधत समितीने भरीव मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांसह मच्छीमारांना दिले. यामध्ये पथकाचे प्रमुख आयएएस अधिकारी अशोककुमार परमार, केंद्रीय अर्थ विभागाचे संचालक अभय कुमार, केंद्रीय वीज बोर्डाचे अधिक्षक अभियंता जे. के. राठोड, केंद्रीय कृषी विभागाचे संचालक आर. पी. सिंग, कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, मत्स्य विभागाचे संशोधक अशोक कदम यामध्ये सहभागी झालेले होते.चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय पथकाने बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी वादळापुर्वी प्रशासनाकडून घेतलेली काळजी आणि त्यानंतर मदतीसाठी केलेले प्रयत्न याची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थिती भविष्यात राबविले जात असलेल्या प्रकल्पांचे प्रेझेंटेशन सादर केले. त्यात भूमिगत विज वाहिनी प्रकल्प, शेल्टर प्रकल्प यांचा समावेश होता. दिलेल्या माहितीवर पथकातील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.बैठकीनंतर पथकाने वादळातील बाधित बागायतदारांशी संवाद साधला.