▪️ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

▪️ गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे.

▪️ दरम्यान, पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

काय आहे मंत्री गडकरी यांचं ट्विट? : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, असे ट्विट गडकरी यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते नाना पटोले?
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.